Thursday, 21 April 2016

श्री स्वामी समर्थ प्रकटस्थान, कर्दळीवन प्रवासवर्णन भाग २

॥ श्री स्वामी समर्थ ॥
----------------------
श्री स्वामी समर्थ प्रकटस्थान, कर्दळीवन प्रवासवर्णन भाग २
----------------------


दि.२३ जानेवारी २०१६
पहाटे ३.३० वाजता उठलो. सर्व स्नानादि कर्मे उरकली. मामाने गाडी पुसली आणि सकाळी ५ वाजता आम्ही डॉ.राहुल सरांच्या घराकडे निघालो. ५ गाड्या बोलाविण्यात आल्या होत्या. सर्वजण थंडीचा बचाव करण्यासाठी स्वेटर, जरकीन घालून एकत्र जमा झाले होते. सर्वांच्या बॅग गाडीवर बांधण्यात आल्या आणि सकाळी ५.३० वाजता एकामागे एक ५ गाड्या श्रीशैल कडे मार्गस्थ झाल्या. पहाटेच्या धुक्यात सोलापूर बुडून गेले होते. माझ्या ओळखीचे डॉ.राहुल सर व निलेश सर शाम मामाच्या गाडीत होते .. त्यामुळे एकटे वाटत नव्हते...स्वामींच्या नामाचा जयजयकार झाला आणि गाड्यांनी वेग धरला...गेली २ वर्षे शाम मामा सारखा म्हणत होता, तुम्ही स्वामी भक्त आहात. कर्दळीवनात या. स्वामींचे प्रकट स्थान बघा. परंतू तसा योग जुळून येत नव्हता. अचानक शाम मामा, डॉ.राहुल सर आणि निलेश सर वेळापूर येथील श्री अर्धनारी नटेश्‍वर मंदिरात याग करण्यासाठी आले होते. तेव्हा अचानक त्यांनी कर्दळीवनाचा विषय काढला आणि मी ठरविले की काहीही झाले तरी २३ जानेवारी रोजी कर्दळीवनात जायचेच. ... ते आता पूर्ण होणार...


आम्ही सकाळी नास्त्यासाठी श्री क्षेत्र कडगंची येथे थांबणार होतो. श्री क्षेत्र कडगंची कडे जाताना भारद्वाज पक्षाने आमचा रस्ता ओलांडला. सगळे म्हणाले, शुभ शकून मिळाला. नाष्टा, जेवण कधी, कोठे करायचा हे ठरलेले होते... त्यामुळे सकाळी ८.३० वाजता आम्ही श्री क्षेत्र कडगंची येथे पोहोचलो. याठिकाणी श्री गुरु चरित्राचे लेखक श्री सायंदेव यांचे मंदीर आहे..येथे श्री गुरूदेव दत्तात्रय यांचे मंदिर आहे. श्री दत्तात्रयांची येथे अप्रतिम आणि सुंदर मूर्ती आहे. श्री गुरू दत्तात्रय आणि श्री सायंदेव यांचे दर्शन करून आम्ही नास्ता केला. येथे मस्त इडली सांबर वरती आम्ही ताव मारला.... थोड्याशा विश्रांती नंतर आम्ही श्रीशैल कडे निघालो.. जेवणाच्या ठिकाणी पोहोचायला वेळ होता. त्यामुळे मी मस्त झोप काढायची ठरवले. दुपारी ३ वाजता आम्ही मेहबूबनगर येथे दुपारच्या भोजनासाठी थांबलो. येथे वेलकम हॉटेलमध्ये सर्वांनी मस्त सांबर, भेंडी, चपाती, वरण, भात, दही, पापडाचा आस्वाद घेतला आणि सायंकाळी ४ वाजता आम्ही श्रीशैल कडे रवाना झालो. सायंकाळचे ६ वाजले होते. आम्ही श्री शैल चा घाट चढाई सुरू केली. अवघड वळणे शाम मामा अगदी सराईत पणे पार करीत होता.  डोंगर घाटातून गाडी जाताना मी कुठे काही हरीण, वाघ, जंगली श्‍वापदे दिसते का ते पहात होतो. परंतू मोर आणि माकड यांच्याशिवाय काहीच दिसले नाही. सरते शेवटी आम्ही ६.३० वाजता चेक पोस्ट जवळ पोहोचलो. तेथुन श्री शैल १५ किमी होते. येथे मी मोबाईल सुरू केला आणि घरी फोन करून सांगितले की, मी श्री शैल मध्ये पोहोचलो आहे. व्यवस्थित आहे. माझा फोन २ दिवस बंद राहील. रेंज नसल्यामुळे. त्यामुळे मी परत श्रीशैलमध्ये आल्यानंतर फोन करतो असे सांगून फोन बंद केला. मी फोन बंद केला खरा परंतू या आधी मी ५ मिनिटही माझा फोन बंद केला नव्हता. त्यामुळे माझा व घरच्यांचा दोन दिवस संपर्क नसणार म्हणल्यावर माझ्या जीवाची घालमेल सुरू झाली. तीच परिस्थिती घरच्यांचीही झाली असेल असाच विचार मनात येत होता. एकीकडे घरच्यांशी २ दिवस संपर्क नसणार म्हणून जीवाची घालमेल तर दुसरीकडे स्वामींच्या दर्शनाची ओढ अशा अवस्थेतच रात्रौ.७ वाजता आम्ही श्री शैल मंदिराजवळ पोहोचलो. तेव्हा असे ठरले की यंग माणसे रात्री डोंगर चढाईस सुरुवात करतील व जेष्ठ नागरीक पायथ्याशी असणार्‍या आप्पाराव स्वामी यांच्याकडे राहतील. आम्हाला आता होडी मधुन प्रवास करायचा होता. सुमारे ५ ते ७ किमी चा प्रवास ते पण होडीमधुन...शेवटी रात्री ८.२० वाजता बोट सुरु झाली आणि सर्वांनी स्वामी व गंगा मातेच्या नामाचा जयघोष सुरु केला व चंद्राच्या शितल प्रकाशात आम्ही प्रवास सुरु केला कर्दळीवनाकडे .... होडी सुरू झाल्यानंतर समुद्र गुरूजी यांनी गंगामातेची साडी चोळीने ओटी भरली व साडी चोळी गंगेला अर्पण केली आणि गंगा मातेचा जयजयकार केला. पौर्णिमा असल्याकारणाने चंद्र आम्हाला होडीतील प्रवासाला रस्ता दाखवित होता. अशा मस्त शितल छायेत आम्ही श्री व्यंकटेश किनारा येथे रात्री ९ वाजता पोहोचलो. येथे आप्पाराव स्वामींकडे थोडी विश्रांती घेतली. अंथरण्यासाठी येथे बेडरोल व चालण्यासाठी काठी घेतली. काही जेष्ठ मंडळी आप्पाराव स्वामी यांच्या येथे मुक्कामी राहिली व बाकीच्या लोकांनी रात्री १० वाजता स्वामीनामाचा जयघोष करून पहिल्या पायरीचे दर्शन घेउन स्वामी दर्शनासाठी डोंगर चढाईस सुरुवात केली. मी शाम मामा, निलेश सर, डॉ.राहुल सर, समुद्र गुरूजी यांच्याबरोबर प्रवास सुरु केला. पहिल्यांदाच पूर्ण चढाई होती.. त्यामुळे सावकाश चालत होतो. डोंगर चढाई करताना कसे चालायचे? पाय कसे टाकायचे? या सूचना आधीच शाम मामा ने मला दिल्या होत्या. त्यामुळे त्या सूचनांचे पालन करीतच मी डोंगर चढत होतो. चंद्रमा आम्हाला त्याच्या शितल छायेत व भरपूर प्रकाशात जंगलातील रस्ता दाखवित होता. त्यामुळे मध्ये मध्ये हातातील बॅटर्‍या बंद करीत होतो. डॉ.राहुल सर म्हणाले, दोन दोन फूट अंतर ठेवूनच चाला. म्हणजे एकत्र राहून प्रवास करू. मनात स्वामी दर्शनाची आस होती. त्यामुळे प्रचंड उत्साह संचारला होता. परंतू मनाच्या दुसर्‍या कोपर्‍यात याची भिती पण होती की, कोठून तरी जंगली श्‍वापद आपल्यावर हल्ला करेल. दाट काळोख, घनदाट जंगल आणि विविध आकार असलेली झाडे यातून आम्ही प्रवास डोंगर चढत होतो. मध्येच कोणीतरी आपल्याकडे पहात आहे असा भास झाला म्हणून मी त्यादिशेने बॅटरीचा प्रकाश टाकला तर ते एक झाडाचा बुंधा होते. मनातल्या मनात मी म्हणालो, हुशऽऽऽ झाड आहे आणि स्वामींना सांगितले, सुखरूप तुमचे दर्शन होवू द्या. सर्वांना व्यवस्थित तुमच्या चरणाशी आणा. अशा विचारातच आम्ही पहिल्या डोंगरातील एक टप्पा पूर्ण केला. आम्ही बोलत, बोलत चालत होतो आणि चंद्राचा शितल प्रकाश असल्यामुळे थकवा जाणवत नव्हता. शाम मामा म्हणाला, आता पूर्ण सपाट प्रदेश आहे. मला वाटले, चला आता चालताना त्रास होणार नाही. परंतू हा सपाट प्रदेश पूर्ण दगडांनी भरला होता. एकीकडे खोल दरी तर दुसरीकडे उंच डोंगर अशा स्थितीत पाऊलवाटेने आम्ही मार्गक्रमण करीत होतो. बाकीचे लोक आमच्या आधी निघून गेले होते. आम्ही ५-६ जणच पाठीमागे होतो. हसी, मजाक मध्ये आम्ही डोंगरातून वाट काढीत चालत होतो. मध्येच भयाण जंगल तर मध्येच विरळ जंगल होते. निलेश सर, डॉ.राहुल सर, शाम मामा मला सारखे म्हणत होते, पाय जपून टाक. काठी हातात घट्ट धर. काठी वाजवत चाल. मी त्या पद्धतीने चालत होतो. मी मामाला विचारले, अजून किती लांब आहे. मामा म्हणाला, आता शेवटचा ७ डोंगर सुरू होईल. तो डोंगर पहिल्या डोंगरापेक्षाही चढाईचा आहे. त्यामुळे निट, व्यवस्थीत पाय टाकून चाल. मला सर्वांनी मध्ये घेतले होते. जेणेकरून मी कुठे चुकू नये. टप्प्यातील शेवटचा डोंगर सुरू झाला. मी बॅटरीच्या प्रकाशात अंदाज घेतला की किती उंच डोंगर आहे. परंतू त्या डोंगराचे टोक काही केल्या मला दिसले नाही. मनात ठरवले आता स्वामींनी एवढ्या लांब आणले आहे तर तेच येथून पुढे नेतील आणि डोंगर चढाईस सुरूवात केली. अत्यंत दगडधोंड्याचा रस्ता होता. प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागत होते. उजव्या बाजूला खोल दरी होती. मी जपून पाऊल टाकत मार्गक्रमण करीत होतो. चालता चालता अचानक माझा पाय निसटला आणि मी खाली गुडघ्यावर बसलो. तेवढ्यात मामा म्हणाला, मुन्ना सावकाश.....मी म्हणालो, काही प्रॉब्लेम नाही...उठलो आणि आम्ही थोडी विश्रांती घ्यायचे ठरवले. आता ७ व्या डोंगरातील शेवटचा टप्पा राहिला होता. येथून पुढे पुन्हा सपाट प्रदेश सुरू होणार होता. आम्ही अंधार्‍या रात्रीत कसाबसा तो टप्पा पूर्ण केला आणि सपाट प्रदेश सुरू झाला. आजचा मुक्काम हा अक्क महादेवी च्या गुहेमध्ये होता. आता मनामध्ये उत्सुकता लागली होती की, कशी असेल ही गुहा. असा विचार करीतच आम्हा एका ठिकाणी थांबलो. मी विचारले काय झाले? तर मामा म्हणाला, हा स्वामींचा नाम आहे. मी म्हणालो, म्हणजे? डॉ.राहुल सर म्हणाले, स्वामींचा नाम ज्याप्रमाणे यु आकाराचा असतो ना तसा हा दगड आहे. याला स्वामींचा नाम म्हणतात. मी ते पाहिले आणि आश्‍चर्यचकितच झालो. कारण स्वामींच्या कपाळी जसा नाम आहे तसाच नाम या दगडावरती होता. मी स्वामींच्या लिला पाहून अचंबीत झालो आणि त्या नामावर डोके ठेवून नतमस्तक झालो. मामा म्हणाला, पुढे स्वामींचे पाऊलपण आहे. मला आता प्रचंड उत्सुकता लागली होती. स्वामींच्या चरण दर्शनाची ओढ लागली होती. अशा मनःस्थितीतच आम्ही स्वामींच्या चरणाकडे मार्गक्रमण करू लागलो.

आता रातकिड्यांची किरकिर सुरू होती. मध्येच दूर कुठून तरी एखाद्या जंगली श्‍वापदाचा आवाज येत होता. मनात एक प्रकारे भितीही होती. परंतू स्वामी दर्शनाच्या ओढीने ही भितीही मध्येच गायब होत होती. चालत चालत आम्ही स्वामींच्या चरणाजवळ आलो. येथे पोहोचलो आणि पाहतो तो काय स्वामींचे चरण. आज खरोखरच मी धन्य झालो. मी पटकन माझ्या पाठीवरील बॅग काढली, हातातील काठी ठेवली, बूट काढले आणि स्वामींच्या चरणावर डोके ठेवले. श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय म्हणत मी स्वामींच्या चरणावर नतमस्तक झालो. आज माझे जीवन सार्थक झाले. समुद्र गुरूजी म्हणाले, दिवसा आलो असतो तर मस्त चंदनाची पूजा केली असती परंतू रात्रीच्यावेळी कशी करणार पूजा? सर्वांनी स्वामींच्या चरणाचे दर्शन घेतले आणि अक्क महादेवी गुहेकडे मार्गस्थ झालो. चालत चालत आम्ही अक्क महादेवी गुहेजवळ पोहोचलो. सगळीकडे उजाड माळरानच होते. मी मामाला म्हणालो, इथे गुहा कोठे आहे? मामा म्हणाला, खाली बग. सुमारे ३०-४० पायर्‍या खाली उतरलो आणि समोर एकाच दगडाचे छत असलेली अक्क महादेवीची गुहा दिसली. सगळीकडे दाट अंधार होता. बॅटरीच्या प्रकाशात ती गुहा खूप भयानक वाटत होती. आमच्या आधी आलेले कधीच झोपी गेले होते. मी घड्याळात वेळ पाहिली तर रात्रीचे १२.३० वाजले होते. या गुहेत खूप माणसे झोपी गेली होती. आम्ही एका ठिकाणी जागा शोधली आणि आमच्या बॅग काढून ठेवल्या. चालून आल्यामुळे प्रचंड भूक लागली होती. येथे मस्त भात आणि सांबर बनविण्यात आले होते. आम्ही ताट घेतले आणि मस्त भात व सांबरवर ताव मारला. जेवण झाले. निलेश सर म्हणाले, सकाळी स्वामींच्या दर्शनाला प्रकट स्थानाकडे जायच आहे. मी म्हणालो, मग हे काय आहे? ते म्हणाले, ही अक्क महादेवीची गुहा आहे. येथे अक्क महादेवीं व अनेक साधू पुरूषांनी तपश्‍चर्या केली आहे. अक्क महादेवीची ही तपोभूमी आहे. मी मनोमन नमस्कार केला आणि झोपी गेलो..कारण उद्या स्वामींच्या दर्शनाला जायचे होते....

क्रमशः
--------------------------------

औदुंबर सूर्यकांत भिसे, वेळापूर
--------------------------------

No comments:

Post a Comment